मैत्रीचा ठेका नक्की कुणाचा ?

आपल्या बॉलीवूडने मुलांना चांगल काय शिकवलं नसलं तरी एक गोष्ट मात्र नक्कीच शिकवली आहे आणि ते म्हणजे मैत्री. 'दोस्ताना', 'दिल चाहता है', 'शोले' अगदी अलीकडचे 'संजू', 'थ्री इडियट' आणि अजून बरेचं काही... या सर्व चित्रपटामध्ये लक्षात राहतो तो कार्तिक आर्यनचा 'सोनू के टीटू कि स्वीटी'. म्हणजे मित्राला एखादी मुलगी किती वाईट आहे हे जीव तोडून सांगितलं तरी तो ऐकत नाही पण ज्यावेळी 'तुला मुलगी पाहिजे कि मी' असा प्रश्न विचारल्यावर क्षणाचाही विलंब न लावता 'मला मित्र पाहिजे' असं बोलून मैत्रीचा आदर्श निर्माण केला गेला.
मुलं सहज म्हणतात कि भावा 'प्रेमापेक्षा मैत्रीवर आहे', 'लडकी बाद में पहले अपनी दोस्ती', 'तू अभी इतनी अमीर नहीं हुई कि हमारी दोस्ती खरीद सके' etc. etc...... हे सगळं ठीक आहे, सगळं चांगल देखील आहे पण सध्या मैत्री निभावण्याचा आणि जपण्याचा ठेका फक्त मुलांनीच घेतला आहे. प्रेमाच्या नात्यात प्रेयसीला किती स्थान द्यायचं आणि मित्रांना किती स्थान द्यायचं हे फक्त आणि फक्त प्रियकर ठरवतो अर्थात दोघांच्या वतीने तो एकटाच ठरवतो. रिलेशनशिपमध्ये मुलीने तिच्या प्रियकरापेक्षा मित्रांना किंवा मैत्रिणींना जास्त महत्त्व द्यायचं नाही. रिलेशनमध्ये प्रेयसीचे मित्र नसतात म्हणा ते इमोशनल ब्लॅकमेलिंगच्या नावाखाली तोडले जातात. जर प्रेयसीने प्रियकराला समजविण्याचा प्रयत्न केला किंवा त्याच्या या निर्णयाविरुद्ध बंडखोरी केली तर मग एक मोठा जागतिक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे 'तुला तो जास्त महत्त्वाचा आहे कि मी किंवा माझ्यापेक्षा तुला तो जास्त गरजेचा आहे ?'... बस्स आणि या जागतिक प्रश्नात मुलीची मैत्री कुठेतरी हरवून जाते.
आता मुलाची मैत्री... जर प्रेयसीने प्रियकराला म्हटलं कि तुझे मित्र चांगले नाहीत तू त्यांच्यासोबत राहायचं नाही. मग मात्र पहिला आरोप केला जातो कि तुला त्यांच्याबद्दल काय माहित आहे? ज्यावेळी माझ्यासोबत कोण नव्हत तेव्हा ते होते. त्यांच्याशिवाय मला दुसरं कोणी नाही आहे. वाह या भावना फक्त मुलांच्याच. त्या नंतर माझे मित्र कसेही असले तरी मनाने चांगले आहेत आणि माझ्या एका आवाजावर हजर राहतील. तुला राहायचं असेल तर राहा माझ्यासोबत नाही तर जा कारण मैत्रीपुढे प्रेम महत्त्वाचे नक्कीच नाही.
किती तो विरोधाभास... म्हटलं ना मैत्री जपण्याचा आणि निभावण्याचा ठेका फक्त मुलांचाच असतो मुलींसाठी त्यांच्या प्रियकराशिवाय दुसरा कोण महत्त्वाचा नसलाच पाहिजे. किती विरोधाभास आहे या दोन गोष्टीत ?
याचा शेवट कसा करावा ते समजत नाही आहे म्हणजे या परिस्थितीमध्ये हसावं कि रडावं ? सहमती दाखवावी कि बंडखोरी करावी ? पण माझं वैयक्तिक मत सांगायचं झालं तर 'नात्यामध्ये दोघांसाठी समान नियम असले पाहिजेत'. स्वतःच्या सोयीनुसारच जर नियम बदलायचे असतील तर नियम ठेऊच नये. दोघांनीही एकमेकांच्या मित्रांना आपलसं करावं आणि प्रेमासोबत मैत्रीदेखील जपावी.

Comments

Popular posts from this blog

My Kind of CINEMA – Kuchh Bheege Alfaaz (2018)

शेवटची भेट

कारण आपल्यात सगळं असेल पण ते प्रेम नसेल....